Sunday, April 26, 2015

भालचंद्र नेमाडे ह्यांचे ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना केलेले  भाषण
श्रीधर तिळवे

भालचंद्र नेमाडे ह्यांनी ज्ञानपीठ स्वीकारताना केलेले भाषण हे एका लेखकाचे भाषण वाटलेच नाही . असे वाटले कि retirement घ्यायला निघालेला प्राध्यापक आपल्या नोकरीतील कामाविषयी अवघडलेल्या अवस्थेत बोलतोय . मुख्य म्हणजे नेमाडेंचा नेहमीचा मिश्किल लेखक मिसिंग होता . असे का घडले ? कारण उघड आहे . नेमाडेंनी भाषणासाठी निवडलेली भाषा . नेमाडे मराठीत भाषण करून आपला देशीवाद मांडतील अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्ष कृती करताना त्यांना मार्गी निवडणे भाग पडले आणि त्यांनी चौथ्या नवतेची ''मार्गी , देशी ,पोटी आणि जमाती ह्यांचा समतोल हवा आणि मार्गीसाठी इंग्लिश अपरिहार्य आहे '' ही भूमिका स्वीकारली. हा विरोधाभास आजचा नाही . सुरवातीपासूनचा  आहे .  इंग्लिश मध्ये भाषण करताना मिश्कीलता येणार कशी आणि कुठून ? वाईट गोष्ट म्हणजे नेमाडे नैसर्गिक ही वाटले नाहीत .

मात्र ह्या भाषणात त्यांनी आपली लेखनभूमिका अत्यंत नेमक्या भाषेत मांडली . नेमाडे नेहमीच अवकाश आणि काळ अशी वैज्ञानिक  सुरवात करतात जी मलाही मान्य आहे मग नेमाडे हळूच मागील दाराने परंपरा आणतात जी मला अमान्य आहे . इथेही त्यांनी तेच केले . मग हजारो वर्षाचे सातत्य त्यांनी आणले आणि शेवटी नवे होऊन पुन्हा तसेच होतो असे सांगितले . आमचे म्हणणे असे कि एखादी गोष्ट सातत्याने टिकली म्हणून महान होत नाही अन्यथा जातीव्यवस्था, अस्पृश्यता आणि गुरूचरित्र ह्यांनाही महान म्हणावे लागेल . बुद्ध टिकला म्हणून महान नाही तर महान आहे वसुधैव ग्लोबल आहे म्हणून टिकला . अर्थात सर्वच महान गोष्टी टिकत नाहीत . अनेकदा रानटी लोकांनी महान गोष्टी जाळून वा आघात करून नष्ट केल्या आहेत उदाहरणार्थ सहज आणि तीलोपा  ह्यान्च्या कविता . त्या भारतातून नष्ट झाल्या होत्या . तिबेटी बुद्धिस्ट धारेने त्या टिकवल्या म्हणून मिळाल्या . महान गोष्टी फक्त निर्माण होऊन चालत नाहीत तर त्या टिकवाव्या लागतात प्रतिगामी संस्कृती प्रतिगामी गोष्टी टिकवतात उदा . गुरुचरित्र , वेद पुरोगामी संस्कृती पुरोगामी गोष्टी टिकवतात .प्रश्न असा कि महान गोष्टी महान का होतात नेमाडे म्हणतात देशियतेमुळे आम्ही म्हणतो मार्गी , देशी , पोटी आणि जमाती ह्यांच्या समतोलामुळे हा समतोल साधण्यात देशीवाद एक अडथळा म्हणून अडगळीसारखा आडवा येतो म्हणून आमचा देशिवादाला विरोध आहे आणि मार्गीपण, देशीपण , पोटीपण आणि जमातीपण ह्यांना पाठींबा आहे . नेमाडे ह्यांनी ह्याही भाषणात देशीवाद मांडला . इंग्लिशमधून मांडला . पण देशिवाद्च मांडला .

 त्यानंतर मोदींनी वेद आणि वेदातील वैज्ञानिकता हा हिंदुत्वाचा लाडका अजेंडा आणलाच आणि आम्ही ज्याची मांडणी करतो तो सिद्धांत  '' देशीवाद हा अंतिमतः मूलतत्ववाद्यांना मदत करणार आहे '' सिद्ध केला . वेदकाळात जसे ऋषी तसे नेमाडे असे सांगून भविष्यकाळातील नेमाडेंची ऋषी भालचंद्र नेमाडे ही प्रतिमाही प्रज्वलित केली . नेमाडेपेक्षा मोदी अधिक नैसर्गिक वाटले .

मोदींनी मांडलेला सरस्वतीबरोबर लक्ष्मी आली पाहिजे हा मुद्दा अचूक होता . पण मला एकदा चित्रपट अभिनेता गोविंदा ह्याच्या आईने म्हणजे निर्मलाआईनी सांगितलेला मुद्दा त्याला जोडावसा वाटतो तो म्हणजे '' श्रीधर बेटा इस फिल्डमे आना है तो एक बात ध्यानमे रख ये दुनियाका एकमात्र फिल्ड ऐसा हैं जिसमे लक्ष्मी सरस्वतिके पीछे आती हैं ।'' ते अकरा लाख रुपये म्हणजे सरस्वतीच्या पाठीमागे आलेली लक्ष्मी होती . नेमाडे कधीही शक्य असूनही लक्ष्मिच्या मागे गेले नाहीत . त्यांनी अत्यंत जीव पणाला लावून सरस्वतीची साधना केली ज्ञानपीठ हा त्या साधनेचा गौरव आहे आणि नेमाडे त्याला पूर्ण पात्र आहेत . नेमाडे ह्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन !

No comments: