Friday, December 27, 2019

तुमने अच्छा लिखा था ग़ालिब मगर
तुम्हारे मरनेके बाद वो अच्छा लगा
श्रीधर तिलवे नाईक 

Friday, March 1, 2019

किशोरला मी डाय हार्ड रोमँटिक कवी म्हणून ओळखतो आम्ही चौघांच्या कविता नावाचा प्रोग्राम एकत्र करायला लागलो तेव्हा किशोर रोमँटिक दासू आधुनिक प्रकाश होळकर देशी आणि मी चौथी नवता अशा मराठीतील चारी महत्वाच्या नवता आम्ही सादर करत असू आम्हा चौघांचेही हे पिंड होते आणि एकमेकांच्या पिंडांना आदर व सन्मान देत आम्ही हा कार्यक्रम सादर करत असू स्वतःच्या भावनांच्यात ठाय मांडून बसलेल्या किशोर कदमांच्या कविता आणि स्वतः किशोर ह्यांच्यात द्वैत नाही अत्यंत हळवा आणि ओव्हरसेन्सिटिव्ह असणारा माझा हा मित्र तशाच कविता लिहितो आणि प्रामाणिकपणे लिहितो पण अलीकडे झालेला महत्वाचा बदल म्हणजे तो अलीकडे टाळ्यांची अपेक्षा करत नाही तो स्वतःसाठी लिहितो दुसरा बदल म्हणजे अलीकडे त्याने फक्त स्वतःत ठाय मांडणे सोडले आहे तो भवतालच्या अवकाशाविषयी सचेत झाला आहे तो व्यक्ती म्हणूनही सचेत होताच पण आता त्याच्या कवितेत हे आढळते आहे आणि हा बदल उत्तम आहे 

Wednesday, February 27, 2019

माझ्या वैचारिक लिखाणाबाबत आत्ताचा श्रीधर तिळवे काय विचार करतोय असा प्रश्न सारखा येतोय एका अर्थानं तो जिवन्त नाहीये शरीर आहे हे शरीर जे लिहितंय ते अध्यात्मिक आहे मी ते येऊ देतो 

Tuesday, February 26, 2019

मी युद्धाचा कट्टर विरोधक असलो तरी जर समोरचा प्रचंड हिंसक असेल तर
१ सुरक्षणासाठी केलेले संरक्षण
२ आक्रमण झाल्यावर अधिक आक्रमण होऊ नये म्हणून दक्षतेसाठी केलेले अधिकचे आक्रमण
हे नैतिक मानतो
भारतीय सेनेचे म्हणूनच अभिनंदन 

Thursday, February 21, 2019

नामवरसिंह गेले . मराठीत बेडेकर आणि हिंदीत नामवर हे दोन मार्क्सवादी समीक्षक असे होते ज्यांच्याबद्दल भय , आदर आणि हे काय म्हणतात/ किंवा म्हणून गेलेत म्हणून  उत्सुकता असायची /होती बेडेकर आधीच्या पिढीचे असल्याने फार आधी गेले(१९७३)  खुद्द मार्क्सवाद्यांनीच त्यांची पत्रास फारशी ठेवली नाही मग नॉन मार्क्सवादी काय पत्रास ठेवणार त्यामुळं त्यांचा मार्क्सवादी वारसा कोणी मराठीत नीट चालवला नाही अपवाद कदाचित शरद नावरे असावेत पण त्यांनी चौफेर लिखाण न केल्याने ते कोल्हापूरच्या वर्तुळापुरते सीमित आहेत शिरवाडकर वैग्रे ठीकठाक त्यामुळे मार्क्सवाद्यांचा साहित्यातला आवाज ऐकायला नामवारांच्याशिवाय पर्याय राहिला नाही

नामवरांच्या सुदैवाने  त्यांच्यावेळी  नेमका गजानन माधव मुक्तिबोध हा अद्भुत प्रतिभाशाली कवी चक्क मार्क्सवादी होता आणि त्याच्यामुळे हिंदीतला देशीवाद अधिक सशक्तपणे व काहीसा बिनधास्तपणे डावा झाला मराठीतला डावेपणा मात्र कायमच काँग्रेसवादी(गांधीवादी ) आणि आंबेडकरवादी परिघाच्या आत घुटमळत राहिला त्यामुळे नारायण सुर्वेंच्या नंतर मराठीत सशक्त डावी कविता झाली नाही अपवाद माझा मित्र दिलीप धोंडो कुलकर्णी सुहास एकसंबेकर किरण खेबुडकर गणेश विसपुते व अर्थात सतीश काळसेकर त्याउलट डाव्या आंबेडकरवादाने नामदेव ढसाळसारखा अभूतपूर्व कवी जन्माला घातल्याने आणि त्याला पूरक केशव मेश्राम , यशवंत मनोहर , प्रकाश जाधव त्र्यंबक सपकाळे अरुण काळे महेंद्र भवरे भुजंग मेश्राम असे एकापेक्षा एक कवी निर्माण झाल्याने आणि पुढे दया पवारांच्या दलित आत्मकथनाने सारे वळणच बदलल्याने मराठी डावेपणा हा हळूहळू आंबेडकरवादीच झाला  ह्यात भर पडली ती शरद पाटलांच्या माफुआवादाने ! मार्क्स फुले आंबेडकर ह्यांना एकत्र कसे घेऊन जायचे ह्याचे उत्कृष्ट मॉडेलच शरद पाटलांनी सादर केल्याने मराठीत शुद्ध मार्क्सवाद्यांची गरजच सम्पली . पुढे कांचा  इल्लय्याने मार्क्स आणि आंबेडकर ह्यांना एकत्र न्हेण्याची गरज मांडली तेव्हा ती नॉनमराठी लोकांना थोर वाटली तरी मराठी लोकांना ती शरद पाटलांच्यामुळे आधीच माहिती होती हिंदीत मात्र आंबेडकरवादाचा प्रभाव फार उशिरा पडायला लागल्याने तिथली साठोत्तरी डावी कविता अधिक सशक्त निपजली आणि नामवरांनी तिला आवश्यक असलेली समीक्षिय बॅकग्राउंड व्यवस्थित पुरवली डिकलोनायझेशनचे मार्क्सवादी आर्थिक विश्लेषण त्यांना उत्कृष्ट जमले पण त्यांच्या परखडपणामुळे आणि ते ज्या जेएनयू त शिकवत होते त्याच्या डाव्या वर्तुळामुळे त्यांना हळूहळू मठाधीशाचे स्वरूप प्राप्त झाले काँग्रेस त्यांच्यामागे उभी राहिली कारण शेवटी ती जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी होती आणि डाव्याना उत्तेजन देण्याची आणि त्याचबरोबर मॅनेजही करण्याची ती उत्कृष्ट सोय होती

गजानन माधव मुक्तिबोधांना हिंदी कवितेच्या केंद्रस्थानी आणण्यात त्यांचा प्रचंड वाटा होता आणि निर्मल वर्माच्या कथेलाही त्यांनीच महत्व प्राप्त करून दिले आपल्याकडे विंदा करंदीकर हे डावे पण प्रभावी कवी होते पण नेहरूंचे मॉडेल प्रमोट करणारे असल्याने काँग्रेसचा प्रभाव वाढला त्यातच सुर्वे चांगले कवी असले तरी त्यांच्याकडे गजानन मुक्तिबोधांच्या टोलेजन्ग प्रतिभेची वानवा होती त्यामुळे मराठीत नामवरांना कोणी समांतर समीक्षक दिसत नाही

नामवरांचा  जन्म बनारसला झाला होता आणि काशीच्या पांडित्यगिरीचे अवशेष त्यांच्यात जोरदारपणे शाबूत होते   राहुल सांकृत्यायन हे डावे ऋषी वाटायचे आणि ते डावे पंडित ! साहजिकच ते कालिदासाचा टीकाकार मल्लिनाथ आपला कुळपुरुष असल्यासारखे बोलायचे आणि शास्त्रार्थ मनापासून करायचे आणि त्यासाठी आवश्यक असणारी तल्लख बुद्धी , धाडस , वादविवादपटुता आणि एन्सायक्लोपीडिक डाटा त्यांच्याजवळ भरपूर होता शेवटी ते हजारीप्रसाद व्दिवेदींचें शिष्य होते अमर्त्य सेनांची शब्दावली वापरायची तर आर्गुमॅन्टिव्ह इंडियन !

कविताके नये प्रतिमान (१९६८)ह्या ग्रंथाने त्यांची ही डावी पंडितीगिरी चालू झाली मूल्यकेंद्री साहित्याचा आग्रह त्यांनी जोरदारपणे लावून धरला जे जे अस्तित्वात आहे त्याची टीका झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि साहित्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना मान्य होते आणि वेळ आली तेव्हा साहित्याची स्वायत्तता त्यांनी लावून धरली  मार्क्स आणि साहित्याची स्वायत्तता ह्या दोन गोष्टी थेरॉटिकली एकत्र जात नसल्या तरी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी कलेची स्वायत्तता आवश्यक असल्याने तिचा पुरस्कार केल्याशिवाय पर्याय राहात नाही असे मला वाटते हे तसेच आहे जसे मुस्लिम एखाद्या  राष्ट्रात अल्पसंख्याक असले कि सेक्युलर असतात . त्यामुळे मार्क्सवाद्यांना समजली नाही तरी मी नामवरांची अडचण ओळखून होतो

मी कोल्हापुरात असतांना त्यांच्या समीक्षिय विधानांना कधी निरमा कधी निर्मला (हा कोल्हापूरचा वॊशिंग पॉवडरचा स्थानिक ब्रँड होता जिथे मी बालपणी प्लास्टिक पॅकिंग शिकलो होतो  ) म्हणायचो माझा मित्र राजकुमार यादव हा हिंदीचा विद्यार्थी असल्याने आमच्यात नामवरांना धरून काही वादही होत त्यांचे चांगले विधान असले कि निरमा व खराब विधान असले कि निर्मला असे आमचे चाले नामवरांनी दोन्ही प्रकारची विधाने करत स्वतःकडे लक्ष्य राहील ह्याची काळजी घेतली

दुसरी परंपराकी खोज नंतर नामवरांनी लिखित असं काही काम केलं नाही बहुधा ओरलचा शोध घेता घेता तेच ओरलच्या इतक्या प्रेमात पडले कि त्यांनी लिखिताकडे पाठ फिरवली बहुतांशी पंडित भारतात  शेवटी व्याख्याते होतात त्यांचेही असेच काहीतरी झाले असावे .

कम्म्युनिस्ट असल्याची किंमत त्यांनी आयुष्यभर चुकवली प्राध्यापकीय दोन जॉब त्यांना सोडावे लागले (एकदा बनारस तर एकदा सागर ) सीपीआय च्या जनयुगाचे ते काही काळ संपादकही होते आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे एक निवडणूक लढून ते हरले होते टेन्शनला नव्या कवितेचे प्रमुख लक्षण मानणारी त्यांची समीक्षा स्वतःच्या जीवनातही नानाविध टेन्शनस  पाळून होती बहुदा त्यांनीच संरचनावाद साहित्याच्या अभ्यासक्रमात प्रथम आणला


मार्क्सवाद्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या वैचारिकतेत अनलिमिटेड हृदय नाही आणि आत्मा तर बिलकुलच नाही परिणामी एक रुक्ष पण शास्त्र व शस्त्र हातात धरणारी IDEOLOGY असे त्याचे स्वरूप राहते
आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारून त्याला अनलिमिटेड हृदय देण्याचा प्रयत्न केला अनेक मार्क्सवाद्यांना आजही हे कळलेलं नाही नामवरांची गोची हीच होती कि संवेदनशीलतेमुळे त्यांच्याकडे हृदय होते आणि मार्क्सवादाच्या चौकटीत ह्या हृदयाचे काय करायचे हे त्यांना शेवटपर्यंत कळले नाही मला वाटते ही केवळ त्यांचीच नाही तर त्यांच्या अख्ख्या पिढीचीच शोकांतिका आहे

नामवरांच्या बरोबर ही पिढीही गेली . नामवरांचे जाणे हा त्या पिढीचा अस्त आहे .
त्यांच्या स्मृतीला माझा सलाम !

श्रीधर तिळवे नाईक














Wednesday, February 20, 2019

रुडॉल्फ रुडी गेला त्याच्या माझ्या कॉमन मित्रांनी मला किंवा इतर कुणाला कळवायचीही तसदी घेतली नाही कारण तो झीच्या त्या टॉप पोझिशनवर न्हवता ज्यासाठी लोक त्याच्याभवती गोळा होत . तो लवकर जाणार ह्याची कल्पना सर्वच जवळच्या मित्रांना होती पण इतक्या लवकर असेही वाटले न्हवते

रुडीची माझी ओळख माझ्या कन्नड मित्रांनी करून दिली होती मराठी साहित्यात मी जरी मराठी माणूस असलो तरी बॉलिवूडमध्ये माझी ओळख एक तुळु  कन्नडीग अशी असल्याने रुडी माझ्या जवळ चटकन आला रुडी कन्नड ख्रिश्चन असल्याने त्याची जीवनशैली ही ख्रिश्चन आणि साऊथ इंडियन कन्नड अशा दोन संस्कृतींनी युक्त होती आणि दोन्ही संस्कृतींचा तो अभिमानी होता त्यातच त्याचे काही नातेवाईक आस्ट्रेलियात सेटल झाल्याने ऑस्ट्रेलियन ख्रिश्चनिटी हा त्याच्या आस्थेचा विषय होता त्याचा धार्मिक गुरुही ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन परंपरेतून आलेला होता ऑस्ट्रेलियात एक वेगळी ख्रिश्चनिटी जन्माला येत आहे ह्याविषयी आमच्यात एकमत होते

प्रत्यक्ष व्यवहारात मात्र तो प्रॅक्टिकल होता किंबहुना "श्रीधरअण्णा थोडा प्रॅक्टिकल बनना  "अशी भुणभुण माझ्यामागे लावणारे जे लोक होते त्यात तो एक होता मोक्षावर विश्वास नसल्याने माझा संन्यास त्याला अनाकलनीय होता त्याच्या दृष्टीने कयामत सत्य होती त्यामुळे मी मोक्ष नावाच्या भ्रमाच्या मागे न लागता करियरच्या मागे लागावे अशी त्याची इच्छा होती

त्याने स्वतःचे करिअर झी पासून सुरु केले होते आणि झीच्या आरंभीच्या लोकांपैकी तो एक पायोनियर होता झी नेटवर्क्स नेमके कसे उभे होत गेले ह्याचा तो चालता बोलता इतिहास होता आपल्या बॉसवर त्याचे गाढ प्रेम होते आणि भारतातलं पहिलं खाजगी चॅनेल उभं करण्यात आपलाही खारीचा वाटा आहे ह्याचा त्याला सार्थ अभिमान होता . खाजगी चॅनेल्सच्या मालिकांचे प्रॉडक्शन डिझाईन करण्याची भारतीय पद्धत त्याने तयार केली ज्यात भारतीयांचा आळस , भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा गृहीत धरण्यात आला होता झीचा पहिला ग्रेट सेलिब्रिटी प्रोड्युसर जो एकेकाळी एकता कपूर एव्हढाच प्रसिद्ध होता तो माझा एकेकाळचा  दोस्त असल्याने मला दुसरी बाजूही समजत होती पण पहिली कम्पनी ही अशीच उभी राहत असल्याने ह्याला पर्याय नाही हेही कळत होते पुढे होम टीव्हीने अत्यंत निर्माताकेंद्री दयाळू स्ट्रक्चर आणले तर त्याचा एका वर्षात कचरा झाला . त्यामुळे रूडीला नावं ठेवणारे लोक सरळ झाले .

पैसा त्याचा वीक पॉईंट होता पण तो कसा हाताळावा हे मात्र त्याला कळत न्हवते पुढे जेव्हा मला तो हे सगळं आपल्या फॅमिलीच्या सुरक्षिततेसाठी करतोय हे लक्ष्यात आलं तेव्हा त्याच्या ह्या वीक पॉइंटला मी माफ केलं त्याला जन्मापासून डायबेटीस होता आणि तो अतिउच्च होता त्यामुळे आपण कधीही मरू शकतो अशी त्याला भीती होती आपल्यामागे आपल्या कुटुंबाचं सगळं नीट व्हावं म्हणून तो धडपडत होता त्याचं  आपल्या बायकोवर प्रेम होतं आणि ते शेवटपर्यंत होतं तिच्यासाठी त्यानं काही गोष्टी सोडल्या किंबहुना शेवटची काही वर्षे तो फॅमिलीसाठीच जिवन्त राहण्याची धडपड करत होता साहजिकच तो बायकोला बिझनेस शिकवत होता जे आमच्या मित्रांना खटकायला लागलं . मी भांडणात उभा रहात नाही सरळ बाहेर पडतो . मोक्ष मिळालेला नसतांना लोकांना तृष्णांचा अंत कर असं कोणत्या तोंडानं सांगणार बरं सगळी भांडणं ही तृष्णांची आसक्त्यांची भांडणं असतात त्यामुळे दोन्ही पार्ट्यांच्या तृष्णा मला साफ दिसत होत्या

आणि मग मला अपघात झाला मी बेडरिडन तो हायर डायबेटिक त्यामुळं भेटी दुर्मिळ झाल्या आणि  तो डायबेटिसमुळं अकस्मात गेला त्याच्या बायकोचा ३० दिवसाचा शोक हा त्यांच्यातल्या नात्याविषयी बरंच काही सांगणारा होता . परवा ती पहिल्यांदा नीट झोपली आणि मित्र निवांत झाले

रुडीला मी नेहमी म्हणायचो ," रुडी ,   तुझी वाट कयामतीची  माझी मोक्षाची त्यामुळे आपण मरण्यापूर्वी भेटणं शक्य नाही "    त्यावर तो हसायचा .

नियतीनं हे बोलणं खरं केलं . आमची शेवटची भेट झालीच नाही .     

श्रीधर तिळवे नाईक




Wednesday, February 13, 2019

विष्णू सूर्या वाघ गेला . तो विष्णू होता सूर्य होता आणि वाघही होता . विष्णू होता कारण गोवन परम्परा रोमँटिक आणि सुमधुर भाषेत कशी मांडायची हे त्याला नीट माहित होते आणि तिचा वापर स्वतःच्या भल्यासाठी कसा करायचा हेही त्याला पॉलिटिकली नीट माहित होते तो सूर्य होता कारण सगळ्या काव्यग्रहांना स्वतःभोवती कसे फिरवायचे हे त्याला माहित होते त्याच्या भाषेचा प्रकाश त्याला नीट माहित होता गोव्याचा माहोलच असा आहे कि तुम्ही रोमँटिक आपसूकच होता मात्र हा रोमँटिक माहोल सामाजिक करणारे जे काही कवी होते त्यातील तो एक होता माझे दोन मित्र दैनिक गोमंतकाचे  संपादक झाले श्रीराम पचिंद्रे आणि विष्णू . विष्णूने गोमंतकाला एक चेहरा दिला  त्याचे अमोघ वक्तृत्व त्याला शेवटी राजकारणात घेऊन आले तिथेही   तो गोव्यातील बहुजनवादाचा वाघ म्हणून वावरला  .

तो माझा वैचारिक शत्रू होता आणि आम्हा उभयतांना हे प्रेमळ शत्रुत्व मान्य होते त्याचे मगोप सोडणे मला कधीच आवडले नाही पण त्याच्याकडे त्याची कारणे होती पुढे त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथे तो इलेक्शन जिंकलाही पण त्या जिंकण्यातही एक अस्वस्थता होती किंबहुना अस्वस्थता आणि चंचलता त्याचा स्थायीभाव होती कि काय असे वाटावे इतक्या वेगाने त्याचे स्टान्स काहीवेळा बदलत त्यामुळेच मगोप , शिवसेना , काँग्रेस आणि भाजप अशा चारही पक्षात त्याची फेरी झाली

रोमँटिक माणसाचे सारे गुणदोष त्याच्यात होते आणि विलक्षण आवेगात जगण्याचा झेलझपाटाही त्याच्या तुकारामावरच्या तुका अभंग अभंग नाटकाने जो त्याकाळी वाद निर्माण झाला होता तेव्हा मी सौष्ठवमधून संपादकीय लिहून त्याला जाहीर पाठिंबा दिला होता मात्र तसाच पाठिंबा मी त्याच्या कवितेला द्यावा ही त्याची अपेक्षा मी कधीच पूर्ण केली नाही त्याने गोव्यात भरवलेल्या काव्यहोत्राला  मी ठाम भाषेत नकार दिल्याने तो माझ्यावर चांगलाच उखडला होता पण माझा नाईलाज होता आमच्यातल्या वैचारिक मतभेदांनी आमच्या मैत्रीचा बळी घेऊ नये म्हणून मी जागरूक असे आणि गोव्यात गेलो कि शक्यतो कॉन्टक्ट करी पण त्याच्या दृष्टीने मी च्यू असल्याने हळूहळू आमचे नाते विरत गेले

त्याच्या सुदिरसुक्तातील फरक ह्या कवितेवरून  झालेला वाद तर अनावश्यक होता शूद्रांच्या पॉईंट ऑफ व्हू ने मांडलेली ही कविता एव्हढी वादग्रस्त होईल असे कुणालाच वाटले न्हवते गोव्याच्या बदलत चाललेल्या चेहऱ्याची ती नांदी आहे

आज तो गेलाय तर याज्ञवल्कावरून आम्ही दोघांनी घातलेले वाद आठवतायत त्याचा बोलण्याचा धबधबा आठवतोय त्याच्या स्वभावातील राजकारणात राहूनही त्याने जपलेली आर्तता आठवतीये त्याचा बिनधास्त पणा आठवतोय तो गेले काही महिने आजारी होता मात्र त्यातूनही वाचून परतला होता त्यामुळे सर्व काही कदाचित ठीक होईल असं वाटत असतानाच तो अनपेक्षितपणे गेला

एका तडफेचा अंत असा व्हायला नको होता

गुड बाय विष्णू

श्रीधर तिळवे नाईक 

Monday, January 28, 2019

जॉर्ज फर्नांडिस गेले . बिगरकाँग्रेसवादाचा लोहियानंतरचा मुख्य चेहरा गेला . काँग्रेसचं काय करायचं हे न कळलेला एक रशरशीत समाजवाद गेला .
एका ब्रिटिशसमर्थक सरंजामवादी ख्रिश्चन फॅमिलीत जन्मलेले  आणि पंचम जॉर्जच्या प्रेमापोटी आईनं ठेवलेल्या जॉर्ज ह्या नावाला पूर्ण विसंगत आचरण करणारे हे वादळ जन्मजातच समाजवादी होतं . त्यामुळेच प्रीस्टचं प्रशिक्षण घ्यायला गेलेल्या कुमारवयीन जॉर्जला सर्वात प्रथम खटकली ती चर्चमधील आचरणातील विषमता ! भोजनाच्या विषम वागणुकीला विरोध करून जॉर्ज बाहेर पडले ते थेट मुंबईत दाखल व्हायला वकील झालो तर वडिलांचे खटले लढवायला लागतील म्हणून त्याला नकार देत ! घराला नकार , चर्चला नकार ही जॉर्जियन नकारवादाची घंटा पुढे काँग्रेसला नकार , आणीबाणीला नकार अशी व्यापक होत गेली काही माणसे ही कायम विरोधी बाकावर बसलेली असतात जॉर्ज फर्नांडिस हे त्यातील एक !

लोहियांनी बिगरकाँग्रेसवाद मांडला पण त्याचा तात्विक पाया कच्चा होता मुळात काँग्रेसचं समाजवादी असेल तर तुम्ही तिला समाजवादाच्या आधारे विरोध करणार कसा ? असे विरोधासाठी विरोध फार काळ टिकत नाहीत आणि ते टिकलेही नाहीत काँग्रेसला हरवण्याची क्षमता फक्त दोनच आईडियालॉजीत होती

१ साम्यवाद कारण त्यांच्याकडे एकपक्षीय राजवटीचा विकल्प होता आणि तो लोकशाही नाकारू शकत होता
२ हिंदुत्ववाद  कारण त्याचा राष्ट्रवादच पूर्णपणे वेगळा होता शिवाय तो भांडवलवादी होता

ह्यात बिगरकाँग्रेसवादी समाजवाद्यांची गोची होणं अटळ होतं ती लोहियांची झाली तशी जॉर्ज फर्नांडिसांचीही झाली अशावेळी आमचा शर्ट तुमच्या शर्टापेक्षा अधिक स्वच्छ आहे हे सर्फ एक्सल स्टायलीत पटवावे लागते आणि भ्रष्टाचारविरोधी लढे अधिक तीव्र करून समोरच्याला हरवावे लागते अण्णा हजारेंनी हे पुढे करून दाखवले पण त्याआधी ते जयप्रकाश नारायणांनी आणिबाणीविरोधी आंदोलनात करून दाखवले स्वच्छतावादी आंदोलनाची मक्तेदारी भारतीय जनतेनं ही गांधीवाद्यांना दिलेली असल्याने अशा स्टायलीतल्या समाजवादी आंदोलनांना भारतीय जनता पाठिंबा देत नाही परिणामी विनोबा भावेचें सर्वोदयवादी भूदान जेपींचे सर्वोदयवादी आणिबाणीविरोधी आणि अण्णा हजारेंचे सर्वोदयवादी लोकपालवादी अशी गांधीवादी आंदोलने  काहीकाळ स्वच्छतेने चमकतात आणि पुन्हा भारतीय राजकारणात येऊन मळतात  भारतात अशा आंदोलनांचा अंतिम फायदा हा कायमच जनसंघाला  व हिंदुत्ववादाला झाला आहे .


भारतात गांधीवादाला यशस्वी व्हायचं असेल तर गांधीवादाने हिंदुत्ववादाला ठाम नकार दिला पाहिजे अशी माझी मांडणी १९८५ पासून मी मांडत आलो आहे पण तिला प्रतिसाद नाही हिंदुत्ववाद हा प्रथम गांधीवाद्यांचा फायदा घेतो आणि मग त्या त्या गांधीवाद्याचं करेक्टर अस्ससिनॅशन करून त्या त्या आंदोलनाने निर्माण केलेली बिगरकाँग्रेसी व्याप्ती व्यापतो गांधी , विनोबा भावे , जयप्रकाश नारायण आणि अलीकडे अण्णा हजारे ह्या सर्वांच्या बाबत हे घडलं आहे जॉर्ज फर्नांडिसांनी आणिबाणीविरोधात भाग घेतला तेव्हा हेच घडलं आणि अलीकडे किरण बेदी जश्या भाजप मध्ये जाऊन बसल्या तसे जॉर्ज फर्नांडिस भाजपच्या झोळीत जाऊन बसले जेपींच्या संपूर्ण क्रांतीने लालूप्रसाद यादव व मुलायमसिंग यादव  जन्माला घातले अण्णांच्या आंदोलनाने केजरीवाल !


जॉर्ज फर्नांडिसांचे असे भाजपबरोबर  जाऊन बसणे अनेकांना आवडले नाही पण  बिगरकाँग्रेसवादी राजकारणाची ही अटळ परिणीती होती व आहे . माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि लोहियांनी काँग्रेसमध्ये जाऊन बसायला हवं होतं जे काही किरकोळ मतभेद होते ते काँग्रेसांतर्गत मांडता आले असते निदान लालू प्रसाद यादवांच्या सारखी सरंजामी भ्रष्टाचारी भूतं तरी भारतीय जनतेला झेलावी लागली नसती आणि समाजवादी कोटाची अशी व्ही आय पी अंडरवेअर झाली नसती . ज्याला काँग्रेसबरोबर जायाचे नाही तो अंतिमतः भाजपच्या झोळीत जाऊन बसतो किंवा फुटकळ युत्यांचे आणि प्रतियुत्यांचे राजकारण करत बसतो . फर्नांडिस हे उत्तरार्धात असे झाले . ही अपरिहार्यता होती कि अगतिकता होती हे सांगणे कठीण आहे .


ह्याचा अर्थ फर्नांडिसांचे आयुष्य वाया गेले का ? तर नाही त्यांच्यामुळे पाच मौलिक गोष्टी भारताला मिळाल्या

१ मुंबई म्युनसिपालटीत मराठीची सक्ती ही फर्नांडिसांच्या मुळेच झाली कन्नड लोकांनी कायमच देशी भाषांचा आग्रह लावून धरला आहे तमिळमध्ये पेरीयारनी तामिळ लोकांना तामिळ भाषेचा आग्रह शिकवला होता फर्नांडिसांनी मराठी लोकांना मराठीचा आग्रह कसा लावून धरायचा ते शिकवलं हा आग्रह लोहियांच्या समाजवादी देशीवादातून आला होता

 २ कोंकण रेल्वे पूर्ण करणे कोकण रेल्वेची कल्पना मधू दंडवतेँच्या नंतर कुणी लावून धरली असेल तर ती  जॉर्ज फर्नांडिसांनी ! त्यांच्यामुळेच कोकण रेल्वेची योजना तडीला गेली

३ कारगिल युद्ध जिंकणे

४ चायना हा भारताचा मुख्य शत्रू आहे पाकिस्तान न्हवे ही डिफेन्स लाईन मांडणाऱ्यात फर्नांडिस अग्रभागी होते आम्हा साउथवाल्यांना हा धोखा सतत जाणवतो कारण हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरात हिंडणारी चायनीज जहाज त्यामुळं फर्नांडिसांच्या ह्या डिफेन्स लाइनचं मला आश्चर्य वाटत नाही 

५ आय बी एम आणि कोला सारख्या मल्टिनॅशनल कम्पन्यांना तुम्ही राष्ट्रीय कायद्याच्या वर नाही हे आपल्या कृतीतून दाखवून देणारे फर्नांडिस हे कदाचित पहिले समाजवादी असावेत  त्यांच्यामुळेच ह्या दबावाची सुरवात झाली आणि आजही तो टिकून आहे

फर्नांडिस हे हिंदुत्ववाद्यांच्या बरोबर राहिले असले तरी हिंदुत्ववादी झाले नाहीत रशियाच्या कोलॅप्समुळे जगभरातील समाजवादी चळवळ सैरभैर झाली फर्नांडिस त्याला अपवाद न्हवते

त्यांच्यामुळे एक समाजवादी अंकुश  जन्माला आला ज्यामुळे त्यांना सुरवातीला बंदसम्राट ही पदवीही मिळाली आज त्या समाजवादी अंकुशाचा अस्त झाला मला ज्या काही मोजक्या समाजवाद्यांच्या बद्दल प्रेम आहे त्यातील ते एक होते त्यांना माझा कडक शेवटचा सॅल्यूट !

श्रीधर तिळवे नाईक 



















Sunday, January 27, 2019

चिन्हकी प्रास्ताविक

नितीन वाघ हा आमचा मित्र फार आग्रह करू लागल्याने बासनात गुंडाळून ठेवलेली चिन्हकी बाहेर काढतोय १९८९ ला नाटकावर पीचडी करायला मुंबई विद्यापीठात ऍडमिशन घेतलं आणि माझ्या गाईडनी सर्वात पहिले जे काही प्रश्न निवडले त्यात मेथोडॉलॉजी कोणती असा प्रश्न होता आणि मी दिलेले उत्तर होतं संरचनावाद आणि उत्तरसंरचनावाद ! साहजिकच त्या अंगाने नोट्स काढणं सुरु झालं त्याचच एक पुस्तक होईल असा ऐवज झाला दुर्दैवानं माझ्यावर जी केस झाली त्याने सगळी चक्र उलटी फिरली असो पण जे काम केले होते त्याचा एक फायदा झाला तो म्हणजे थिएटर अकादमीत व्याख्यान देण्यासाठी मला मेहनत करावी लागली नाही कारण थिसीस डोक्यात पक्का होता चिन्हमीमांसेच्या नोट्स मात्र बऱ्यापैकी शाबूत होत्या त्याच दुरुस्त करून इथं देतोय खरेतर ह्या काढायच्या होत्या छापील स्वरूपात अडाहॉकाबानासुना नंतर आगामी म्हणून तशी त्या पुस्तकात  नोंदही होती पण अडाहॉकाबानासुनात घातलेले पैसेही निघाले नाहीत आणि प्लॅन बारगळला माझे सर्वच साहित्य पडून राहिले आणि मराठीतील एक अनावश्यक लेखक हे बिरुद माथी लागले असो

खरेतर ह्या चिन्हकीचा उपयोग काय असाच प्रश्न मला पडलेला असतो जिथे गंगाधर पाटलांचीच पत्रास मराठीनं ठेवली नाही तिथं माझ्यासारख्या ह्या क्षेत्रात अकादमीक बैठक नसलेल्या भुरट्या असणाऱ्या माणसाची लायकी ते काय ?

चिन्हे ही आपली त्वचा आहे कि मेंदू हा आजच्या युगाचा खरा सवाल आहे मिडीयम मेसेज देतं कि मेसेज मिडीयम निर्माण करतो ? चिन्ह आपण बनवतो कि चिन्ह आपल्याला बनवतात ? आपण चिन्हांचा फक्त बनाव आहोत काय ? अस्तित्व नावाची गोष्ट खरोखर असते का कि ती चिन्हांनी तयार केलेली थाप आहे ? चिन्ह सत्यात असतात कि सत्य चिन्हात असतात ? चिन्ह विचलित झाल्यावर सत्य  विचलित होते काय ? आपण आपल्या आयुष्यातील सर्वच सत्ये मीडियाकडून भाड्याने घेतो काय ? पृथ्वी ही फक्त लोकेशन असून आपण तिचे फक्त युनिट मेंबर आहोत का ? राष्ट्रे म्हणजे शेवटी प्रॉडक्शन हाउसेस का ?भारत राजश्री प्रॉडक्शन हाऊस आहे काय ? श्रीमंताकडची चिन्हेही श्रीमंत असतात काय आणि गरिबाघरची गरीब ? बाळासाहेब ठाकरे चिन्ह कि माणूस कि एखादी व्यक्ती हयात असे तोवर माणूस आणि नंतर चिन्ह ? बॉम्बेचे नाव मुंबई ठेवले तर खरोखर काय होणार ? नामांतराच्या चळवळी ह्या फक्त चिन्हांतराच्या चळवळी आहेत का ? मोक्ष हा मीडियाच्याविरुद्धचा शेवटचा डिफेन्स आहे का ? सिविल डिसॉबिडियन्सच्या धर्तीवर मीडिया डिसोबिनियन्स चळवळ उभा करता येणे शक्य आहे का ? ज्यांना टेकनॉलॉजी कळत नाही तेच नैतिकतेच्या आणि धर्माच्या चर्चा अधिक करतात काय ? चिन्ह हे बैलगाडीचे चाक आहे कि अख्खी बैलगाडी आहे कि बैल आहे ? रहस्यांचा काळाबाजार गॉसीप्स निर्माण करतो काय ? मीडियापासून जो आपली रहस्य वाचवतो तो पॉलिटिशियन अशी व्याख्या करता येईल का ? न्यायव्यवस्था चिन्हव्यवस्था वाचते काय ? गरजा इन्व्हेन्शन्स स्पॉन्सर करतात कि इन्व्हेन्शन्स गरजा तयार करतात ? कार ही गॉसिप्सची बेडरूम असेल तर बेडरूम शरीरातल्या सेक्सकारची ड्रायवर आहे का ? मेंदू टीव्हीत सकाळी अंघोळ का करतो ? जाहिरात कंपन्या जाहिरातीसाठी रोज नवा प्रोडक्ट शोधतात कि प्रोडक्ट स्वतःसाठी जाहिरात कम्पन्या शोधतात ? संस्कृतीत घर महत्वाचे कि रस्ते ? धर्माचे सांस्कृतिक योगदान हा फुगा कोणी सोडला कसा सोडला आणि उडणारे त्या फुग्याला घट्ट कसे धरून ठेवतात ? फुगे फुटू न देता त्यांना घट्ट धरून ठेवण्याची युक्ती भारतीयांना नेमकी कशी साधते ? अर्थशास्त्र आज असते तर राजकारण का मग कालचे असते आणि कधी कधी प्राचीन काळचे ? इतिहास दंतकथा रिप्ले करत असेल तर परंपरा कशी फॉरवर्ड होणार ? इनपुट आणि आउटपुट ह्यांच्यात फरक का पडतो ? मी बोलतो तेव्हा माणूस असतो कि चिन्ह असतो कि चिन्हमाणूस असतो ? चिन्हमाणूस किंगडम ऍनिमेलियात मोडतो कि नाही कि त्याच्यासाठी प्राणिशास्त्रात वेगळे किंग्डम निर्माण करावे लागेल ?

हे माझ्या युगाचे प्रश्न आहेत आणि त्यांची चर्चा ही चिन्ह ह्या मूलभूत गोष्टीवर अवलंबून आहे आणि ह्या चिन्हांची सांगोपांग मीमांसा आणि चर्चा म्हणजे चिन्हकी

गर्रमागरमी भडका निर्माण करण्यासाठी नसते तर बॅटरी रिचार्ज करण्यासाठी असते

दोन चिन्हांच्या दरम्यान नेहमीच एक मिस्सीन्ग लिंक असते म्हणूनच संहिता खुल्या राहतात हीही संहिता अपवाद नसणारच त्यामुळे तिने निर्माण केलेले प्रश्न महत्वाचे ! तुम्ही विचाराल कि उत्तरे माहित नसतांना पुस्तक लिहायचेच कशाला ? तर मी प्रश्न विचारतो

मी प्रश्न विचारतो कारण फक्त प्रश्नच कन्विन्सिंगली विचारता येतात उत्तरे नेहमी चाचरत येत असतात आणि जी उत्तरे चाचरत येत नाहीत ती चुकीची असतात 

असो वाघांच्या आग्रहाखातर ही अत्यंत क्लिष्ट असलेली गोष्ट बाहेर काढतोय . ह्याचे पुस्तक निघाले तर ते कोणाला अर्पण करायचे हे मला स्पष्ट होते पुस्तक निघणे  आता शक्य नाही म्हणून अर्पणपत्रिका इथेच देतोय

प्रिय गंगाधर पाटील सर
मराठीत तुम्ही सुरु केलेलं चिन्हमीमांसेचं  मार्गीवादी बांधकाम
आजही माझ्या प्रेमाचा विषय आहे

मी तुमचा विध्यार्थी नाही ह्याची मला कायमच हळहळ वाटली
पण कधीकधी प्रत्यक्ष द्रोणाचार्यांपेक्षा
चिन्हीय मातीचा द्रोणाचार्य हा अधिक परवडतो
कारण त्याला जात नसते वर्ण नसतो
आणि मुख्य म्हणजे तो अंगठा मागत नाही

सआदर तुम्हालाच
अंगठा शाबूत ठेऊन

श्रीधर

(क्रमशः )