Thursday, February 17, 2022

 डिस्को लहर गेली श्रीधर तिळवे नाईक 

भप्पी लाहिरी गेले आमच्या पिढीचा एक वादग्रस्त संगीतकार गेला आमची पिढी नाचायला लागली ती भप्पीदांच्या सुरक्षामधल्या मौसम है गानेका पासून मिथुन चक्रबर्तीला त्यांचा आवाज एकदम फिट्ट बसायचा आणि त्याच्या डिस्कोला वाव देणारे त्यांचे संगीत होते ज्याला फोर ऑन द फ्लोर बिट्स म्हणतात त्याचा भारतीय शैलीत वापर करणारे ते पहिले संगीतकार होते हा बिट त्यांच्याआधी आर डी बर्मन कल्याणजी आनंदजी ह्यांनी वापरला होता पण त्याला पॉप्युलर बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता पुढे डिस्को म्हणून पुढे आलेला हा संगीतप्रकार भप्पीदांनी प्रचंड हाताळला किंबहुना आर डी पेक्षा वेगळी ओळख ह्या वापरामुळेच निर्माण झाली 

जर तिशोत्तरी जॅझची असेल साठोत्तरी रॉकची असेल तर आमची ऐंशोत्तरी ही डिस्कोची होती असं म्हणायला हरकत नाही सॅटरडे नाईट फिवर हा १९७७ चा चित्रपट माझ्या बालपणावर लॉन्ग  टाइम ठसा उमटवून गेला होता आणि माझी डिस्कोशी ओळख इथूनच सुरु झाली 

पुढे ए आर रेहमानपासून जे संगीताचे डिजिटल युग आले त्याची पायाभरणी भप्पीदांनी डिस्को मधून केली नैसर्गिक वाद्यांच्याकडून मॅनमेड वाद्यांच्याकडे सुरु झालेल्या प्रवासात ह्या ऐंशोत्तरी संगीताचा प्रचंड वाटा होता इलेक्ट्रिक पियानो आणि सिंथेसायझर ह्यांनी संगीताचे रूप पालटायला ह्याच काळात सुरवात केली प्रोग्रॅम्ड म्युझिकचा हा आरंभ होता मात्र ह्या बदलांची घनता आणि गहनता समजून घेणे भप्पीदांना जमले नाही ही त्यांची मर्यादा होती त्याऐवजी आर डी पासून वेगळी आयडेंटिटी निर्माण करणे आणि ह्या बदलाचा उथळपणे कमर्शियल वापर करणे ह्याकडे त्यांचा कल होता 

आर डी बर्मनने ओ पी नय्यरला चॅलेंज करून स्वतःचे वेगळे म्युझिक प्रस्थापित केले आणि आरडीला फॉलो करणारे जतीन ललित , आनंद मिलिंद असे एक स्कूल निर्माण झाले भप्पीदा हे ह्या स्कूलमधले पहिले विद्यार्थी त्यांचे वडील अपरेश मुखर्जी बंग संगीतकार होते आणि लता मंगेशकरांचे त्यांच्याकडे येणे जाणे होते (त्यांनी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली होती ) किशोरकुमार अशोककुमार त्यांचे मामा होते साहजिकच घरी संगीताचा माहोल होता मुखर्जी फॅमिली ही इंडस्ट्रीतील एक मोठी फॅमिली (ह्या फॅमिलीतील सुजॉय मुखर्जी हा माझा एकेकाळी मित्र होता त्याच्यामुळे त्याचे वडील जॉय मुखर्जीचा परिचय झाला होता ) होती आणि तिचा त्यांना पाठिंबा होता मात्र ह्या फॅमिलीने उचलेगिरीला कधीच पाठिंबा दिला नाही आणि भप्पीदाला कधीकधी ह्यावरून ऐकवले जाई त्यामुळेच ओरिजिनल धून निर्माण करण्याची त्यांची तडस शाबूत राहिली 

सुरवातीला त्यांनी आरडीच्या शैलीत संगीत दिले त्यांच्या दादू ह्या बंगाली फिल्ममधे लता मंगेशकर गायल्या तर  किशोरमामाने (किशोरकुमार ) चलते चलते मेरे ये गीत याद रखना हे अजरामर गाणे गायिले आणि त्यांची घौडदौड सुरु झाली ह्याचवेळी आप की  खातीर  साठी बम्बयसे आया मेरा दोस्त गाजले 

चलते चलते हा चित्रपट नायक विशाल आनंद देव आनंदची भुरटी नक्कल मारत होता त्यामुळे फ्लॉप झाला तरी त्यातील गाणी गाजली ह्यातले प्यारमे कभी कभी ऐसा हो जाता है हे भप्पीदांचे ड्युएट माझे ऑल टाइम फेवरीट आहे 

मग सुरक्षा आला ह्यातील संगीत आर डी च्या शैलीत असूनही आर डी पेक्षा वेगळे होते ह्यातील दिल था अकेला अकेला मधुर होते तर मौसम हैं गानेका व गनमास्टर जी नाईन ट्रेन्डसेटर ! भप्पीदांनी मला झटका दिला तो तीन  गाण्यांनी पहिले डिस्को डान्सरमधल्या याद आ रहा तेरा प्यार हे  दर्दभरे गाणे हे दर्दभरे गाणे डान्सिकल फॉर्ममध्ये दर्द पेश करणारे पूर्णपणे वेगळे गाणे होते दुसरे वारदात मधले तू मुझे जानसेभी प्यारा है ने ह्यात नशिलेगिरी होती पण डिस्कोथेकमधली होती तिसरे गाणे सलमा आगाचे होते दिलके अरमान आसूंओमे बह गये सारखे सेमिक्लासिकल गाणे ऐकून माझ्या मनात तिच्याविषयी वेगळी इमेज होती भप्पीदांनी त्या इमेजचा अक्षरशः भुगा केला कसम पैदा करनेवालीकी मधले ये रातमें जो मजा हैं  हे गाणे केवळ अभूतपूर्व होते आशा भोसलेंच्या साम्राज्याला ह्या गाण्याने तडा गेला आणि आशा भोसलेंच्यापेक्षाही वेगळ्या आवाजात हस्कीपणा निर्माण करता येतो हे भप्पीदांनी व सलमा आगाने सिद्ध केले (ह्या गाण्याचे  जलवा ४ सारखे व्हर्जन्स ऐकावेत म्हणजे सलमा आगाच्या आवाजाची किंमत कळते शमशाद बेगमच्या स्कूलचा हा आवाज म्हणजे एक नवा व्हर्जन होता आणि तो भप्पीदांनी निर्माण केला होता दुर्देवाने सलमा आगा नंतर मुस्लिम परंपरेत परतली आणि अशी गाणी गाणे तिने बंद केले )ह्या गाण्यात मिथुन डान्स करत न्हवता पण त्याने ड्रम सेट वर जी ऍक्टिंग केली ती झकास होती ह्या गाण्यांच्यात भप्पी गहन होते एक वेगळा साउंड निर्माण करण्याचा सृजनशील प्रयत्न होता ह्याशिवाय मिथुनच्या डिस्को शैलीला पूरक देखा है मैने तुम्हे फिरसे पलटके सारखी आमच्यासारख्या नाचखोर (मराठी समाजाच्या दृष्टीने वाया गेलेल्या  ) लोकांना डान्सप्रवण करणारी अनेक गाणी भप्पीदांनी दिली . 

प्रकाश मेहरांना खास कल्याणजी आनंदजी शैलीत त्यांनी नमक हलाल व शराबी मधली गाणी दिली आणि त्यासाठी त्यांना पारितोषिके दिली गेली ही गाणे छान होती पण जहाँ चार यार मिल जाये व इंतेहा हो गयी इंतजारकी(हे थर्ड डिग्री ह्या अलबमची कॉपी केलेले गाणे होते )  ही फक्त  दोन गाणी भप्पीदा टचची होती बाकी सारा मामला कल्याणजी आनंदजीसारखा होता त्यातील मंजिले अपनी जगह व पग घुंगरू बांध मीरा नाची थी गाजली 

बॉलिवूडमध्ये प्रोड्युसर आणि ऍक्टर्स अनेकदा संगीतकारांना "ह्या गाण्याची कॉपी करा " म्हणून विनंती करतात अशावेळी नकार दिला तर संपूर्ण चित्रपट हातातून जातो त्यामुळे अनेकदा संगीतकार झक मारत चोऱ्या करतात कधीकधी कॉप्या करण्याचा मोह आवरत नाही भप्पीदा ह्याला अपवाद न्हवते त्यांच्या प्यारा दुश्मन मधील हरी ओम हरी सरळ सरळ इरप्शनची कॉपी होती झुबीझुबी हे मॉडर्न टॉकिंगची कोई यहाँ नाचे नाचे द बगल्स ची मेरे पास आओगे (टारझन ) हे मिडल ऑफ द रोडचे ह्याच चित्रपटातील जिलेले जिलेले ओसीबीसा जिमी जिमी हे ओटवनचे वैग्रे (ही यादी खूप मोठी आहे ) नक्कल होते कथेबाबत सलीम जावेद व संगीताबाबत भप्पी लाहिरी ह्यांनी चोरीला  ऑफिशियल केले त्यांना स्वतःला ह्या चोऱ्या पसंत न्हवत्या असं ते म्हणत पण काळ बदललाय आणि मी हे केले नसते तर टिकलो तर टिकलो नसतो असा त्यांचा दावा होता 

जे अमेरिकेत होते ते बॉलिवूडमध्ये दहा वर्षांनी होते १२ जुलै १९७९ ला अमेरिकेत डिस्को डिमॉलिशन नाईट घडली आणि डिस्को संगीताच्या पतनाला सुरवात झाली आपल्याकडे हे पतन १९९० ला सुरु झाले आणि हळूहळू भप्पीदांचे वर्चस्व संपत गेले ए आर रेहमानने ह्या पिढीला चॅलेंज दिले आणि पुढे साजिद वाजिद विशाल भारद्वाज अमित त्रिवेदी ह्यासारख्या संगीतकारांनी ह्या युगाचे वर्चस्व संपवले 

ह्या काळात साऊथमध्ये इलाया राजा जबरदस्त निर्मिती करत होता त्यामुळे भप्पीदांना क्लासिकल दर्जा प्राप्त झाला नाही पण डिस्को संगीताचे त्यांनी अफलातून भारतीयीकरण केले ह्याबद्दल शंका नाही इलायाने असेंडिंग नोट्स निर्माण करून त्यात जी क्रांती केली तशी कोणतीही क्रांती भप्पीदांना जमली नाही इलायाने ए आर रहमान , युवा शंकर ह्यांच्यासारखे त्यांचे संगीत पुढे न्हेणारे शिष्य निर्माण केले तसंही काही बप्पीदांना जमलं असं दिसत नाही आजसुद्धा भप्पीदांनी जे केले त्याचे मूल्यमापन करणं जड जातं कारण त्यांचे कोणते गाणे चोरी केलेलं निघेल सांगता येत नाही 

आजच्या पिढीला मात्र ते माहिती झाले ते डर्टी पिक्चरमधल्या उ लाला उलाला ह्या गाण्यामुळे ! त्यांचे आमच्या काळात दुर्लक्षित झालेले कलियोको चमन सारखे गाणे अचानक रिमिक्समध्ये हिट झाले ह्याबाबतीत जी केस झाली ती त्यांनी जिंकली . 

एक गोष्ट नक्की त्यांनी आमच्या कुमार वयात एक वेगळा नृत्यप्रधान साउंड दिला आणि आम्हाला मनसोक्त नाचू दिले त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 



Wednesday, February 9, 2022

 माझ्या आयुष्यात मी पाहिलेला पाहिलेला पहिला स्टार म्हणजे रमेश देव ! माझी पहिली मिटिंग त्यांच्याबरोबर होती ती हिशेबाची ! मी हिशेब करत असतांना ते काहीसे अचंब्याने पाहत होते . मग वडिलांना म्हणाले ," हा वयाच्या मानाने फार फास्ट आहे "

वडील म्हणाले ,"हो '

आमच्या तिळवे भंडारमध्ये ज्या काही लोकांची खाती होती त्यात देव कुटुंबीय होते त्यामुळे मग भेटी होत राहिल्या अभिनेत्यांचे पैसे वरखाली होत असत त्याला रमेश देव अपवाद न्हवते मात्र घरी सर्व सामान नीट पोहचवा अशी त्यांची विनंती असे व वडील ते काम इमान इतबारे करत कारण देव फॅमिलीही बाहेरून येऊन कोल्हापुरात सेटल झालेली त्यामुळे एक इमोशनल बॉण्ड तयार झाला होता . ते मूळचे राजस्थानी होते आणि प्रख्यात जोधपूर पॅलेस त्यांच्या पूर्वजांनी बांधला होता ह्यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही इतके त्यांचे मराठीकरण झाले होते 

माझे आईवडील रमेश व सीमा देव (माझ्या आईचे व सीमा देव ह्यांचे दोघांचेही नाव नलिनी होते त्यामुळेही एक बॉण्ड होता ) दोघांचेही फॅन दोघांचे जवळ जवळ सर्वच चित्रपट आम्ही बघितले कधीही दुकानात आले कि साधे सरळ वागायचे बोलायचे मुंबईला सेटल होईतोवर हे चालले पुढेही वर्षातून एखादी चक्कर व्हायची १९८० नंतर सर्व कमी होत गेले पण पुढे अजिंक्य देवची प्रत्येक फिल्म आम्ही पाहिली ते वडिलांच्या आग्रहास्तव !

मुंबईला आलो तेव्हा लिस्टमध्ये रमेश देव होतेच मी फोन केल्यावर ते अजिंक्यला फोन करून ते थेट घरीच ये म्हणाले अजिंक्यला मी फोन करून मी पत्ता घेतला आणि भेटलो मी तिळवेंचा मुलगा आहे म्हंटल्यावर सीमा देव एकदम खुश झाल्या रमेश देवांनी सर्वांची आस्थेने चौकशी केली मी त्यांना त्यांच्या शेजारचे अपडेट्स दिले एक जुना माहोल तयार झाला 

पुढे मग अजिंक्यने मला शंकरच्या हिंदुस्थानी ह्या चित्रपटाची रिमेक करायची आहे तू लिहिशील का म्हणून विचारले मला कॉपी करायचा विलक्षण कंटाळा साहजिकच मी प्रयत्न करतो म्हणालो खरा पण माझ्याकडून काही प्रयत्न झाले नाही अजिंक्यच्याही लक्षात आलं असावं बहुदा ! त्याने नाद सोडला आणि नात्यात एक अवघडलेपणा आला 

त्यानंतर मी भेटलो नाही आणि आता थेट वार्ताच आली . एका अत्यंत सज्जन अभिनेत्याचा हा अंत होता मी पुढेही अनेक स्टार्सना भेटलो  पण रमेश देव ह्यांच्याइतका साधा सरळ अभिनेता मी पाहिला नाही त्यांची आनंदमधली भूमिका अनेकांच्या आवडीची पण मला जैसे को तैसा मधला खलनायक अधिक आवडला कारण ते जे न्हवते ते त्यांनी साकार केले होते आनंदमध्ये ते त्यांच्या स्वभावासारखे होते पुढे राजेश खन्नाबरोबर त्यांनी अनेक फिल्म्स केल्या . अभिताभबद्दल त्यांना कौतुक होते आणि आनंदच्या सेटवरचे त्यांनी सांगितलेले किस्से इंटरेस्टिंग होते रामपूरका लक्ष्मण सारख्या  काही सुपरहिट फिल्म्स मध्ये त्यांनी काम केले 

त्यांचे अभिनयाचे स्कूल हे राजा परांजपे ह्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेले होते ज्यात निरीक्षण, नाट्यशिलता  व अनुसरणाला महत्व असायचे त्यांची पहिली महत्वाची फिल्म आंधळा मागतो एक डोळा ही राजा परांजपे ह्यांचीच होती त्यामुळे ते स्वाभाविक होते १९८० नंतर त्यांच्या अनेक हिंदी फिल्म्स आपटल्या आणि महत्वाच्या लेखक दिग्दर्शकांपासून ते दुरावले मात्र नंतर अचानक त्यांना जाहिरातक्षेत्रात निर्माता म्हणून जबरदस्त यश मिळायला सुरवात झाली आणि ते निर्मितीक्षेत्रात स्थिरावले त्यातूनच पुढे अभिनय देव (दिल्ली बेली )हा एक अफलातून दिग्दर्शक आकाराला आला  

त्यांना थोडी अजिंक्याचीच काळजी होती आणि एक भविष्यावैज्ञानिक म्हणून तो किमान मराठीत तरी यशस्वी अभिनेता होईल अशी मी खात्री दिली होती 

आपली दोन्ही मुलं कलाक्षेत्रात आणण्याची रिस्क त्यांनी घेतली आणि ती यशस्वी झाली 

त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 





Sunday, February 6, 2022

 लताबाई गेल्या आणि भवतालावर एक पॉज पसरला बुद्धीच्या आवाक्याबाहेर असलेली त्यांची मधाळ गायकी कायमच आयुष्यात तारे पेरीत मुलायम स्वरप्रकाश प्रकटत करत राहिली जन्मजात गन्धाराचं गूढ कधीच सुटलं नाही दैवी स्वरलयीचं विलक्षण देणं त्यांना लाभलं होतं 

माझा आवडता संगीतकार ओ पी नय्यरने त्यांच्याकडून एकही गाणं गाऊन घेतलं नाही तरीही लताबाई तो गेला तेव्हा त्याचे वेगळेपण अधोरेखित करत्या झाल्या तर ज्यांचं आयुष्य ओपी मुळं घडलं त्या आशाबाई चुप्प राहिल्या हा फरक बोलका होता त्या हिंदुत्ववादी होत्या आणि त्यांनी ते कधीही लपवलं नाही अलीकडे त्यांना त्यामुळे फार बायस टीका झेलावी लागली त्यांची गायकी हिंदवी होती हिंदुत्ववादी न्हवती ह्याचाही अनेकांना विसर पडला 

हिंदी फिल्मी संगीतात स्त्रीगायकीची सुरैया , शमशाद बेगम , गीता बाली आणि लता मंगेशकर अशी चार घराणी आहेत त्यातील लता मंगेशकर घराण्याच्या त्या आद्य प्रवर्तक गीता बाली घराण्यात नंतर आशा भोसले ही त्यांच्यापेक्षा सरस वारस जन्माला आली तसं लता मंगेशकर घराण्यात झालं नाही आमच्या पिढीत त्यांच्यापेक्षा त्यांच्याच घराण्यातील अनुराधा पौडवाल लोकप्रिय झाल्या आणि नंतर अलका याज्ञीक आणि कविता कृष्णमूर्तींनी आपले राज्य निर्माण केले पण तरीही लताबाईंच्या आसपासही कोणी पोहचू शकल्या नाहीत संगीत देवीकडून मानवी कडे जसं जसं कलायला लागलं तशी आशा भोसलेंची पकड काही काळ वाढली तरी लताबाईंचे साम्राज्य अबाधित राहिले आशा जे गाऊ शकत होत्या त्या स्वरावटी लताबाई सहज तितक्याच मादक गाऊ शकायच्या उदा दो घूंट मुझको पिला दे शराबी किंवा ओ जाने जॉ मात्र ह्या मादकपणातही दैवी स्पर्श लपायचा नाही त्या उलट आशाबाईंचा आवाज कधीही दैवी उंची गाठू शकला नाही त्यामुळेच लताबाई ह्या जगातल्या सर्वोत्तम गायिका आहेत हे ठसत राहिलं दैवी कधीही मानवी होऊ शकतं पण मानवी कधीही दैवी होऊ शकत नाही त्याचे हे उदाहरण होते (अपवाद आशाबाईंनी गायिलेले दिन तैसा रजनी ) लताबाईंची 

१ ये दिल और उनकी निगाहोके साये 

२ रातभी हैं कुछ भिगी भिगी 

३ आजा रे परदेसी 

४ ए दिले नादान 

५ झूम झूम ढलती रात 

६ श्रावणात घन निळा 

७ ऐरणीच्या देवा तुला 

८ कही दीप जले कही दिल 

९ पलभरमे ये क्या हो गया वो मैं गयी 

१० लग जा गले 

११ कोई नहीं है फिरभी हैं मुझको 

१२ आपकी नजरोने समझा 

१३ बेदर्दी बालमा तुझको 

१४ सोलह बरसकि बाली उमरको सलाम 

१५ जब प्यार किया तो डरना क्या 


ही माझ्या आवडीची ! त्यांच्या सुरेलपणावर विश्वकोश बनू शकतो इतके हे सूर अचूक आणि अभिजात होते , मराठी लोकांनी करियर कसे बनवावे ह्याचे धडे त्यांच्याकडून गिरवावे इतकी त्यांची मॅनेजमेंट परफेक्ट होती त्यांच्या व्यवहाराला नाक मुरडणारा मराठी स्वभाव हा खरेतर आऊटडेटेड झालेला स्वभाव आहे त्यापेक्षा बॉलिवूडमध्ये मराठी माणसाने कसं वागलं पाहिजे ह्याच्या त्या आदर्श होता राजेश खन्नाच्या आशीर्वादचे आणि शाहरुख खानच्या मन्नतचे वाटेल ते नखरे झेलणाऱ्या मराठी लोकांनी लताबाईंच्या प्रभुकुंजचे नखरे मात्र ओव्हररेटेड केले एकंदरच यशस्वीपणाचे मराठीतील बुद्धिवादी लोकांना वावडे आहे कि काय अशीच शंका येते त्यांनी बालपणात सोसलेल्या दारिद्र्याच्या झळा आयुष्यभर त्यांचा पाठलाग करत राहिल्या त्यातून त्या बाहेर येत्या तर होत्या त्याहून अधिक दिलदार झाल्या असत्या आणि धनासक्त स्त्रीची इमेज तयार झाली नसती 

साहित्यिकांच्यावर विशेषतः गीतकारांच्यावर मात्र त्यांचे प्रेम होते एल एम स्टुडिओत मी संगीतकार म्हणून प्रथम एंट्री मारली तेव्हा तिथे टांगलेले गीतकारांचे फोटो पाहून काहीसा चकित झालो होतो 

संगीतकार सज्जादवरचे  त्यांचे प्रेम हाही माझ्या कौतुकाचा विषय आहे त्यांनी त्याला आठवणीत ठेवला नसता तर कदाचित तो विस्मरणात गेला असता राज कपूरशी त्यांनी घेतलेला पंगा हा तात्विक नीडरपणा दाखवणारा होता (पुढे असाच पंगा अलिशा चिनॉयने यशराज बरोबर घेतला तेव्हा तिला माघार घ्यावी लागली होती )

अलीकडच्या गीतकारीवर त्या प्रचंड नाराज होत्या त्याचा परिणाम गाण्यांची संख्या कमी होण्यात झाला उच्छंख्रुलपणा त्यांच्या पिंडाला मानवणारा न्हवता वास्तविक ज्या आधुनिकतेतला त्या उच्चंख्रुल समजत त्याच  आधुनिकतेतून  माईकचा शोध लागला नसता तर त्यांच्या नाजूक गायकीला कदाचित मान्यता मिळाली नसती त्या पिंडाने अभिजात रोमँटिकवादी होत्या हेच खरे त्यामुळेच गीतलेखनातील आधुनिकता त्यांना झेपणारी न्हवतीच 

इतिहास आणि क्रिकेट ह्याचे त्यांना वेड होते आणि क्रिकेटला स्टेट्स देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता त्या गेल्या आणि अभिजात वळणदार जरतारी सुरेलपणा गेला 

त्यांना माझी आदरांजली 

श्रीधर तिळवे नाईक