Wednesday, February 20, 2019

रुडॉल्फ रुडी गेला त्याच्या माझ्या कॉमन मित्रांनी मला किंवा इतर कुणाला कळवायचीही तसदी घेतली नाही कारण तो झीच्या त्या टॉप पोझिशनवर न्हवता ज्यासाठी लोक त्याच्याभवती गोळा होत . तो लवकर जाणार ह्याची कल्पना सर्वच जवळच्या मित्रांना होती पण इतक्या लवकर असेही वाटले न्हवते

रुडीची माझी ओळख माझ्या कन्नड मित्रांनी करून दिली होती मराठी साहित्यात मी जरी मराठी माणूस असलो तरी बॉलिवूडमध्ये माझी ओळख एक तुळु  कन्नडीग अशी असल्याने रुडी माझ्या जवळ चटकन आला रुडी कन्नड ख्रिश्चन असल्याने त्याची जीवनशैली ही ख्रिश्चन आणि साऊथ इंडियन कन्नड अशा दोन संस्कृतींनी युक्त होती आणि दोन्ही संस्कृतींचा तो अभिमानी होता त्यातच त्याचे काही नातेवाईक आस्ट्रेलियात सेटल झाल्याने ऑस्ट्रेलियन ख्रिश्चनिटी हा त्याच्या आस्थेचा विषय होता त्याचा धार्मिक गुरुही ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन परंपरेतून आलेला होता ऑस्ट्रेलियात एक वेगळी ख्रिश्चनिटी जन्माला येत आहे ह्याविषयी आमच्यात एकमत होते

प्रत्यक्ष व्यवहारात मात्र तो प्रॅक्टिकल होता किंबहुना "श्रीधरअण्णा थोडा प्रॅक्टिकल बनना  "अशी भुणभुण माझ्यामागे लावणारे जे लोक होते त्यात तो एक होता मोक्षावर विश्वास नसल्याने माझा संन्यास त्याला अनाकलनीय होता त्याच्या दृष्टीने कयामत सत्य होती त्यामुळे मी मोक्ष नावाच्या भ्रमाच्या मागे न लागता करियरच्या मागे लागावे अशी त्याची इच्छा होती

त्याने स्वतःचे करिअर झी पासून सुरु केले होते आणि झीच्या आरंभीच्या लोकांपैकी तो एक पायोनियर होता झी नेटवर्क्स नेमके कसे उभे होत गेले ह्याचा तो चालता बोलता इतिहास होता आपल्या बॉसवर त्याचे गाढ प्रेम होते आणि भारतातलं पहिलं खाजगी चॅनेल उभं करण्यात आपलाही खारीचा वाटा आहे ह्याचा त्याला सार्थ अभिमान होता . खाजगी चॅनेल्सच्या मालिकांचे प्रॉडक्शन डिझाईन करण्याची भारतीय पद्धत त्याने तयार केली ज्यात भारतीयांचा आळस , भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा गृहीत धरण्यात आला होता झीचा पहिला ग्रेट सेलिब्रिटी प्रोड्युसर जो एकेकाळी एकता कपूर एव्हढाच प्रसिद्ध होता तो माझा एकेकाळचा  दोस्त असल्याने मला दुसरी बाजूही समजत होती पण पहिली कम्पनी ही अशीच उभी राहत असल्याने ह्याला पर्याय नाही हेही कळत होते पुढे होम टीव्हीने अत्यंत निर्माताकेंद्री दयाळू स्ट्रक्चर आणले तर त्याचा एका वर्षात कचरा झाला . त्यामुळे रूडीला नावं ठेवणारे लोक सरळ झाले .

पैसा त्याचा वीक पॉईंट होता पण तो कसा हाताळावा हे मात्र त्याला कळत न्हवते पुढे जेव्हा मला तो हे सगळं आपल्या फॅमिलीच्या सुरक्षिततेसाठी करतोय हे लक्ष्यात आलं तेव्हा त्याच्या ह्या वीक पॉइंटला मी माफ केलं त्याला जन्मापासून डायबेटीस होता आणि तो अतिउच्च होता त्यामुळे आपण कधीही मरू शकतो अशी त्याला भीती होती आपल्यामागे आपल्या कुटुंबाचं सगळं नीट व्हावं म्हणून तो धडपडत होता त्याचं  आपल्या बायकोवर प्रेम होतं आणि ते शेवटपर्यंत होतं तिच्यासाठी त्यानं काही गोष्टी सोडल्या किंबहुना शेवटची काही वर्षे तो फॅमिलीसाठीच जिवन्त राहण्याची धडपड करत होता साहजिकच तो बायकोला बिझनेस शिकवत होता जे आमच्या मित्रांना खटकायला लागलं . मी भांडणात उभा रहात नाही सरळ बाहेर पडतो . मोक्ष मिळालेला नसतांना लोकांना तृष्णांचा अंत कर असं कोणत्या तोंडानं सांगणार बरं सगळी भांडणं ही तृष्णांची आसक्त्यांची भांडणं असतात त्यामुळे दोन्ही पार्ट्यांच्या तृष्णा मला साफ दिसत होत्या

आणि मग मला अपघात झाला मी बेडरिडन तो हायर डायबेटिक त्यामुळं भेटी दुर्मिळ झाल्या आणि  तो डायबेटिसमुळं अकस्मात गेला त्याच्या बायकोचा ३० दिवसाचा शोक हा त्यांच्यातल्या नात्याविषयी बरंच काही सांगणारा होता . परवा ती पहिल्यांदा नीट झोपली आणि मित्र निवांत झाले

रुडीला मी नेहमी म्हणायचो ," रुडी ,   तुझी वाट कयामतीची  माझी मोक्षाची त्यामुळे आपण मरण्यापूर्वी भेटणं शक्य नाही "    त्यावर तो हसायचा .

नियतीनं हे बोलणं खरं केलं . आमची शेवटची भेट झालीच नाही .     

श्रीधर तिळवे नाईक




No comments: