Thursday, April 2, 2015

रियाजी साहित्य आणि तरबेजी साहित्य / श्रीधर तिळवे


माझे दिलीप पु चित्रे ह्यांच्याशी जे काही कडेलोटी मतभेद झाले त्यातील एक मतभेद हा रियाजी कविता प्रकाशित कराव्यात कि न कराव्यात ह्याविषयी होता . त्यांच्या मते "१९६० नंतरचे सर्व कवी हे मर्ढेकर व पु शि रेगे ह्यांच्या वाटेने जात असताना तू  मनमोहनांची चुकीची व धोकादायक वाट पकडली आहेस  आणि स्वतःच्या रीयाझी कविता प्रकाशित करण्याचा त्यांचा मूर्खपणाही रिपीट करायला निघाला  आहेस  ."
माझे म्हणणे असे कि ''मी काही जाणीवपूर्वक मनमोहनांची वाट पकडलेली नाहीये किंबहूना मराठीत मनमोहन असे काही स्कूल नाहीये असलेच तर त्याचे टोक थेट गाथासप्तशती पर्यंत भिडते आणि रीयाझी कविता प्रकाशित करू नयेत हा आग्रह भांडवलशाहीच्या '' कविता ही क्रयवस्तू असल्याने ती एक फीनिशड product म्हणून ग्राहकांच्यापर्यंत पोहचली पाहिजे '' ह्या आग्रहाचा प्रतिध्वनी आहे .''
 ह्यावर त्यांचे म्हणणे असे होते कि '' जर संगीतात रियाझ कुणी प्रकाशित करत नाही तर कवी म्हणून तू हा अट्टाहास का धरावास ? '' माझे  म्हणणे असे कि '' संगीतातही रियाझ प्रकाशित करण्याचा अट्टाहास आपण धरायला हवा . त्यामुळे कुमार गन्धर्वासारखे संगीतकार गायक कसे वाढत गेले ते कळण्याची शक्यता वाढते . चित्रकलेत चित्रकाराचे रीयाझी काम प्रकाशित होतेच की !''
साहजिकच माझ्या '' डेकॅथलॉन '' आणि ''कोल्हापूर ते मुंबई व्हाया कविता ''( हा पुढे क . व्ही . ह्या नावाने प्रकाशित झाला . ) ह्या दोन्ही संग्रहातील कविता प्रकाशित करायला त्यांचा कट्टर विरोध होता . मी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोय असे त्यांना वाटत होते .
आज ह्या मतभेदाची आठवण येण्याचे कारण पुन्हा एकदा ह्या अंगाने निर्माण झालेली कोंडी . अलीकडे काही रसिक जेव्हा नवीन काय म्हणून विचारतात तेव्हा काय बोलायचे असा एक यक्षप्रश्न माझ्यापुढे निर्माण होतो
२. 
२००७ नंतर माझ्या कवितेने तिसरे वळण घेतले आणि रीयाझी कवितेचा नवीन कालखंड सुरु झाला . पहिले वळण १९८२ साली सुरु झाले त्यातीरीयाझी कविता मी''एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार '' ''डेकॅथलॉन '' ह्या नावाने प्रकाशित करून तरबेजी कविता ''डेकॅथलॉन : रियल '' '' डेकॅथ लॉन :सररिअल ''
'' डे कॅथलोन :ट्रान्सरिअल '' ''डेकॅथलॉन: इनिशिअल'' ''डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल'' ''डेकॅथलॉन:ए ल से ट्रा '' 
ह्या नावाने  आणायचे ठरवले अर्थात नावं ठरली न्हवती आणि संग्रहाची रचनाही ! ह्यातील काही संग्रह आलेही . हिला मी डेकॅथ लॉन series म्हणतो 
दुसरे वळण १९८७-८८ साली सुरु झाले . ह्या वळणातील रीयाझी कविता मी ''क . व्ही '' ह्या संग्रहात आणल्या . ह्या वळणाला मी चांणेल सिरीज म्हणतो . ह्या वळणातील तरबेजी कविता मी ''चांणेल : डीस्ट्रोयरी '' ''स्त्रीवाहिनी '' चांणेल: अंडर द वर्ल्ड '' ''चांणेल: स्पी(निर्वस्तु ) '' ''चांणेल: टी '' ''चांणेल: डब्लू '' ''चांणेल: ज्ञ '' ''चांणेल: आर '' ''चांणेल: श्रीशिल्लक '' ''चांणेल:ग '' '' क . व्ही २'' ''श्रीवाहिनी '' ह्या संग्रहात समाविष्ट केल्या . त्यातील काही प्रकाशितहि झाले . 

प्रत्येक वळणावर मी धडपडलो आणि अडखळलोही ! कुठलेही नवीन मला चटकन पकडता येत नाही . ते अस्पष्ट जाणवते आणि मग माझा रियाझ चालू होतो . हा रियाज आशय आणि अविष्कार अशा दोन्ही पातळ्यावर चालू असतो . कधी आशय जमतो पण अविष्कार जमत नाही तर कधी अविष्कार जमतो पण आशय जमत नाही . मग अचानक सूर सापडतो आणि तरबेजी कविता जमू लागते . 
तिसरे वळण ह्याला अपवाद  ठरले नाही ''चांणेल :डब्लू  व श्रीवाहीनी'' ने मला पार एक्झ्होस्ट केले  कोल्हापुरी भाषेत सांगायचे तर असा काही पीट्टा पाडला की मी आयुष्यात प्रथमच तब्बल एक वर्ष कवितालेस जगलो . ह्याही वळणाची रीयाझी कविता प्रथम प्रकाशित करायची आणि मग तरबेजी कविता प्रकाशित करायची असे मी ठरवले खरे पण अचानक मागील वर्षी झालेल्या अपघाताने सर्व काही उलटेपालटे केले . एकतर  ''चांणेल: स्पी(निर्वस्तु ) '' '' श्रीवाहीनी''  ह्या दोन्ही काव्यसंग्रहांचे प्रकाशन फाफ्ल्ले आणि साक्षात मृत्यू समोर दिसल्याने स्वतःचे सर्व कवितासंग्रह जाऊ द्या पण अर्धे तरी कवितासंग्रह तरी प्रकाशित झालेले दिसतील कि नाही अशी शंका निर्माण झाली . अशावेळी रियाजी कवितासंग्रह काढावा कि न काढावा कि तिसऱ्या वळणाचा थेट तरबेजी कवितासंग्रह काढावा असा प्रश्न निर्माण झाला . हा प्रश्न आजही सुटलेला नाही . त्यामुळे आजकाल कुणी कवितेत काही नवीन ? असे विचारले कि मी confusion आणि chaos आहे असे उत्तर देतो .खरेतर ह्या सिरीजला काय नाव द्यावे हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही . प्रथम रियाजी कि तरबेजी कविता प्रकाशित कराव्यात हा प्रश्न तर फारच टोकदार झालेला आहे . असो . काही लोकांच्या प्रेमळ चौकशीला दिलेले हे उत्तर आहे . प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा सर्वांनाच एकसाथ उत्तर द्यावे म्हणून हा bloggerप्रपंच . 
 
श्रीधर तिळवे

No comments: