Monday, January 18, 2016

माधुरी  पटवर्धन गेली !श्रीधर तिळवे नाईक

 माधुरी  पटवर्धन गेली !एका अत्यंत सॉफ्ट  नजाकतिचा अंत झाला . ती वाढली एका मध्यमवर्गीय संस्कारात आणि मी आझाद चौकाच्या शिव्याबाज मारामारीप्रविण वातावरणात  जन्मलेलो आणि वाढलेलो  ! त्यामुळे आमच्या पहिल्या भेटीत थोडा ताण होता पण हा ताण नंतर निवळला .  मी , भूषण गगराणी , सुनील मोदी आणि संगीता कुलकर्णी अशा आम्हा चौघांची कोल्हापूरकर  महाविद्यालयीन वक्त्यांविद्यार्थ्यांची एक गैंग होती . ह्या चौघांच्यात सर्वात वाईट वक्ता मी होतो पण कधीकधी मटका लागून मला पारितोषिक मिळायचे . ह्यात माधुरी उशिरा आली . अत्यंत शुद्ध मराठी बोलणे आणि किणकिणारा असा तिचा स्वर आणि अत्यंत सोज्वळ असा तिचा चेहरा कायम एवरग्रीन राहणार असा वाटायचा . तिचे डोळे अतिशय सुंदर आणि मातृळू होते . मी तिला एकदा म्हणालो होतो तू फार चांगली आई होणार . तिच्या  हालचालीत एक शालीन सोंदर्य होते .  ती फार सेन्सिटिव होती त्यामुळे माझ्या एका मित्राने तिच्याशी कमी बोल उगाच तुझा बेधडक दे धडक कार्यक्रम राबवू नकोस असा सल्ला दिल्याने मी तिच्याशी कमी आणि अंगात नसलेला आब राखून  बोलायचो . ती बुद्धिमान होती पण कारण नसताना तिला आपण आवश्यक तेवढे बुद्धिमान नाही आहोत असे वाटायचे . ती मनाने एकदम उमदी होती आणि त्या काळात उदासही . तिचे कसे होणार असा प्रश्न मला पडायचा आणि मग माझा शाळासोबती सचिन भानुशाली तिच्या आयुष्यात आला आणि सगळ्या काळज्या संपल्या . त्यानंतर तिच्याविषयीच्या फक्त बातम्या येत राहिल्या . मी कोल्हापुरात ह्या काळात पत्रा - साधना म्हणजे तापलेल्या पत्र्यावर शवासन घालून  प्राणायाम आणि ध्यान करणे सुरु केल्याने ह्या गॅंगपासून हळूहळू  दूर सरकत गेलो त्यात माधुरी सह सर्वच दूर गेले
आणि अचानक आता बातमी आली ती तिच्या जाण्याची ! तिचे हे आकस्मिक जाणे हेलावणारे आहे . तिच्या जाण्याने कोल्हापूरशी असलेला माझा एक  सॉफ्ट धागा कायमचा  निखळला .

श्रीधर तिळवे नाईक 

No comments: